पुरोगामी महाराष्ट्रात कट्टरता जिंकली
पुरोगामी महाराष्ट्रात कट्टरता जिंकली – महाराष्ट्र नेहमीच छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची ओळख असलेला न्हाणून ओळखला जातो. मात्र आज महानगरपालिका/नगरपालिका निवडणुकांचे जे निकाल समोर आले आहेत, ते या विचारांपासून फारकत घेत असल्याचे दिसत आहेत.
महाराष्ट्रात ज्या प्रमाणे निवडणुका झाल्या, त्यामध्ये अनेक अनपेक्षित निकाल लागलेले आपण पाहिले. या निकालांमध्ये मोठे-मोठे पक्ष पिछाडीवर जाताना दिसले, तर छोटे-छोटे पक्ष भरघोस यश मिळवताना दिसले. स्वतःला पुरोगामी विचारसरणीचे ठेकेदार समजणारे पक्ष महानगरपालिका/नगरपालिका निवडणुकांमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत.
कालच्या निकालांमध्ये मुंबई, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणी स्वतःला विशिष्ट वर्गाचे कट्टर नेतृत्व समजणाऱ्या पक्षांना मोठ्या प्रमाणावर जागा मिळाल्या आहेत. मालेगावमध्ये नव्याने स्थापन झालेल्या इस्लाम पार्टीला ३५ जागा, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये AIMIM ला ३३ जागा मिळाल्या आहेत. AIMIM ला महाराष्ट्रात एकूण १२५ पेक्षा अधिक जागा मिळाल्या आहेत.
महानगरपालिका/नगरपालिका निकालांचा अभ्यास केला असता भाजपा महाराष्ट्रात क्रमांक एकचा पक्ष ठरलेला दिसतो आणि त्यानंतर AIMIM ची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे. भाजपा हा पक्ष प्रखर हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी ओळखला जातो, तर AIMIM हा प्रखर मुस्लिम प्रतिनिधित्व करणारा पक्ष मानला जातो.
खरं तर अल्पसंख्यांक समाज हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक मतदार म्हणून ओळखला जात होता. मात्र गेल्या १०–१२ वर्षांत महाराष्ट्रात जे जातीयवादी वातावरण तयार झाले आहे, ते पाहता अल्पसंख्यांक समाज नव्या पर्यायांचा शोध घेताना दिसत आहे. ज्या पक्षांना वर्षानुवर्षे मतदान केले, त्या पक्षांवर आता लोकांचा विश्वास राहिलेला नाही. याला कारणेही तितकीच स्पष्ट आहेत. महाराष्ट्रात मतांचे ध्रुवीकरण करून राजकीय फायदा मिळवण्यासाठी भाजपा मध्ये नव्याने आलेले नेते सातत्याने दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर भाषणे करताना दिसतात. तर स्वतःला पुरोगामी म्हणवणारे पक्ष मात्र गप्प बसून या प्रकारांना मूक संमती देताना दिसतात.
अशा राजकीय वातावरणात स्वतःला असुरक्षित समजणारा अल्पसंख्यांक समाज हळूहळू आपली बाजू घेणाऱ्या AIMIM पक्षाकडे वळत आहे. ज्या पक्षांना अनेक वर्षे मतदान करूनही मुस्लिम समाजाला सक्षम नेतृत्व देता आले नाही, हेही पक्षबदलामागील महत्त्वाचे कारण मानावे लागेल. AIMIM पक्ष स्वतःला हळूहळू सेक्युलर प्लॅटफॉर्मवर आणण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून तो एका व्यापक सेक्युलर पक्षाची जागा मिळवू शकेल.
भाजपा पक्षासाठी हा सुवर्णकाळ ठरताना दिसत आहे, कारण या सर्व मतध्रुवीकरणाचा थेट फायदा त्यांना होत आहे. मात्र महाराष्ट्रात जर विशिष्ट गटांचे प्रतिनिधित्व करणारे पक्ष मोठ्या प्रमाणात वाढत गेले, तर अशा अनेक पक्षांची निर्मिती होईल आणि जात-धर्माच्या आधारावरील राजकारणाची कीड महाराष्ट्राला पोखरून काढेल.
सारांश
पुरोगामी महाराष्ट्रात कट्टरता जिंकली – चला… पुन्हा एकदा छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा पुरोगामी महाराष्ट्र जिंकेल आणि कट्टरता पराभूत होईल, अशी आशा करूया. तसेच ज्या-ज्या पक्षांनी या निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्या सर्व पक्षांना शुभेच्छा देऊया.
हा blog वाचा :-
